Sunday, November 16, 2025

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची निवड ; स्वागताध्यक्षपदी गौरव कोलते!

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या 
अध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची निवड ; स्वागताध्यक्षपदी गौरव कोलते!

जेष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची माहिती...

सासवड, दि. १७ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित १८ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची तर स्वागताध्यक्ष पदी गौरव कोलते यांची निवड करण्यात आली आहे.
अशी माहिती संमेलनांचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या कऱ्हा नदीच्या काठावरील खानवडी येथे दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाला प्रमुख पाहूणे म्हणून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर आदी उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाध्यक्ष प्रशांत देशमुख हे शिव व्याख्याते असून त्यांनी शेकडो व्याख्यानातून समाजाचे प्रबोधन केले आहे. गुड मॉर्निंग, जय शिवराय या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. श्री गौरव कोलते हे गेली पंधरा वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असून आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे संचालक आहे . प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात ते काम करीत आहेत. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला मराठा महासंघ पश्चीम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप, साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धीवार, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, रमेश बोरावके, दत्तात्रय होले, दत्तात्रय कड, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, सचिव दीपक पवार, प्रसिध्दी प्रमुख अमोल भोसले, सुनील लोणकर, गंगाराम जाधव, प्रफुल्ल देशमुख, छायाताई नानगुडे, जगदीप वनशिव आदी उपस्थित होते.

या संमेलनात राज्यभऱातून दरवर्षी मोठ्या संख्येने लेखक, कवी, कलावंत सहभागी होतात. सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो.९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री यादव यांनी केले आहे.

Tuesday, November 11, 2025

मानवतावादाची जपणूक करणारे साहित्य निर्माण होण्याची गरज-दशरथ यादव

मानवतावादाची जपणूक करणारे साहित्य निर्माण होण्याची गरज-दशरथ यादव

अहील्यानगर दि. ११ :  "सध्याचा काळात समाज संभ्रमावस्थेतून जात असून अशावेळी साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून निर्भीडपणे लेखन करावे, मानवतावादी मूल्याची जपणूक करणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले.

मराठी साहित्य मंडळ मुंबई आयोजित सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अहिल्यानगर (केडगाव) येथे आयोजन कऱण्यात आले होते त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून श्री यादव बोलत होते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
श्री यादव म्हणाले, " मराठी भाषा जगवली ती डोंगर खोऱ्यात राहणाऱ्या शेती करणाऱ्या ग्रामीण माणसांनी. शेताच्या बांधावर काम करणाऱ्या समाजाचे दुःख साहित्यात मांडायला हवे, लेखकांनी सभोवतालचे वास्तव साहित्यात मांडणे गरजेचे आहे, सत्याचा शोध घेतलेले साहित्य हे टिकावू असते, मराठी साहित्याला फार मोठी परंपरा आणि विचार आहे, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे संत साहित्य समजला दिशा आणि प्रेरणा देणारे आहे ."

आमदार संग्राम जगताप यांनी ग्रामीण भागात साहित्य संमेलने व्हायला हवीत. साहित्यातून समाज उभा राहतो. डिजिटल मिडिया च्या काळात वाचन संस्कृती कमी होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी मराठी साहित्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. कवी ना घ पांचाळ यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी विनायक जाधव, अनिता काळे यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनांचे संयोजन नानासाहेब डोंगरे, बाळासाहेब देशमुख, अनिता काळे, सुदर्शन धस, आशा शिंदे, भीमराव घोडके, बबनराव खामकर आदींनी केले आहे.सुत्रसंचालन विलास रासकर यांनी केले.

Thursday, October 30, 2025

सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दशरथ यादव यांची निवड

सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य 
संमेलनाच्या अध्यक्षपदी दशरथ यादव यांची निवड

डॉ जयप्रकाश घुमटकर यांची माहिती

पुणे, दि. २९ :  सोळाव्या अखिल भारतीय मराठी
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची निवड करण्यात आली आहे.
मराठी साहित्य मंडळ, मुंबई यांच्या वतीने मंगळवार दि. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी केडगाव जिल्हा अहिल्यानगर येथे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती साहित्य मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी दिली.

      साहित्य संमेलनांचे उद्घाटक आमदार संग्राम जगताप असून, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ नंदकुमार राऊत, डॉ घनश्याम पांचाळ, ललिता गवांदे आदी उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष जयद्रथ खताळ आहेत. संमेलनांचे संयोजन नानासाहेब डोंगरे, बाळासाहेब देशमुख, अनिता काळे, सुदर्शन धस, आशा शिंदे, भीमराव घोडके, बबनराव खामकर आदींनी केले आहे.

        श्री. यादव हे गेली पंचवीस वर्षे साहित्य, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी विपूल लेखन केले आहे. वारीच्या वाटेवर या गाजत असलेल्या ऐतिहासिक महाकांदबरीचे ते लेखक आहेत. यादवकालीन भुलेश्वर या संशोधनपर पुस्तकाच्या तीन आवृत्या निघाल्या आहेत. उन्हातला पाऊस (कवितासंग्रह), शिवधर्मगाथा, मातकट, गुंठामंत्री, सुतसंस्कृती, साहित्यिक संभाजी, जेजुरीचा खंडोबा, पुरंदरचे कोहिनूर, पोवाडा पुरुषोत्तमाचा, महाराष्ट्र शाहीर, घुंगुरकथा, सत्यशोधक दिनकरराव जवळकर, वारीचे अंभग आदी पुस्तकाचे लेखन केले आहे.

      दिंडी निघाली पंढरीला (सिनेमाची कथा), रणांगण (पटकथा आणि संवाद), ढोलकीच्या तालावर (गीतलेखन), गुंठामंत्री (कथा), सत्याची वारी ( व्हिडीओ पटाचे लेखन), भक्तीसागर (व्हिडीओ पटाचे लेखन), दैवत माझे भुलेश्वर माहिती पटासाठी गीत लेखन, महिमा भुलेश्वराचा (गीत अल्बम),गाव कवितेचा, कवि मुलांच्या भेटीला या उपक्रमाचे राज्यभर शेकडो कार्यक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहिशाल विभागात व्याख्याता म्हणून काम. आकाशवाणी, दुरदर्शन, व चँनेलवर कवि संमेलनाचे शेकडो कार्यक्रमातून सहभाग. सासवड येथे झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रवक्ते म्हणूनही काम केले. या पूर्वी त्यांनी बारामती येथे झालेल्या पहिल्या लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, 
सासवड येथे झालेल्या दहाव्या राज्यस्तरीय महात्मा फूले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, दौंड येथील पहिले भीमथडी मराठी साहित्य संमेलन, सोलापूर येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

Saturday, October 25, 2025

विजेचा शॉक लागून पती,पत्नीचा मृत्यू ; नानगाव येथील धक्कादायक घटना!


दौंड, ता.२६ : नानगाव (ता. दौंड) येथील गावात आज (दि. २२) रोजी सायंकाळच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. भीमा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या विद्युत प्रवाहाला शॉकमुळे पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम बापूराव खळदकर व मनीषा राजाराम खळदकर हे दोघे आपल्या जनावरांसाठी भीमा नदीच्या तीरावर चारा आणण्यासाठी गेले असता विजेचा शॉक लागल्याने जखमी झाले. घटनेनंतर लगेचच दोघांना केडगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
हा प्रकार नेमका कसा घडला, कोणत्या उपकरणातून शॉक लागला, याची चौकशी पोलीस व महावितरण विभाग करत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे नानगाव गावात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांनी कुटुंबीयांना भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.

Wednesday, November 13, 2024

दौंड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 3 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

दौंड विधानसभा मतदारसंघात 1 हजार 3 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बजावला टपाली मतदानाचा हक्क

दौंड, दि. 14 : दौंड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कर्तव्यावर कार्यरत असलेल्या 1 हजार 3 अधिकारी कर्मचाऱ्यांनी संत तुकडोजी विद्यालय, एसआरपीएफ कॅम्प येथे टपाली मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली आहे. 

विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडून नमुना 12 भरुन घेण्यात आले होते. टपाली मतदानाकरीता संत तुकडोजी विद्यालय एकूण 3 टपाली मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली. यावेळी निवडणुक कर्तव्यावर असलेल्या 1 हजार 3 अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 408 पोलीस कर्मचारी सहभागी होते. टपाला मतदान प्रक्रियेकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत काळे, टपाली मतदान नोडल अधिकारी दिनेश अडसूळ व सहायक पोपट कुंभार यांनी नियोजन केले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मरकड यांनी दिली.

Sunday, November 10, 2024

दौंड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची दैनंदिन खर्च तपासणी संपन्न

दौंड विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची दैनंदिन खर्च तपासणी संपन्न

पुणे, दि.११ :  दौंड विधानसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक डॉ.ए.व्यंकदेश बाबू यांच्या उपस्थितीत आणि निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांची पहिली दैनंदिन खर्च तपासणी करण्यात आली. 

श्री. बाबू यांच्याकडून उमेदवारांच्या ८ नोव्हेंबर अखेरच्या खर्चाच्या हिशोबाच्या नोंदवह्याची प्रथम खर्च तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी खर्च विषयक मार्गदर्शन करुन सूचना दिल्या. 

यावेळी १४ उमेदवारापैकी १३ उमेदवारांची खर्च तपासणी करण्यात आली. अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांना खर्च तपासणीच्यावेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल खर्च निरीक्षक यांच्या डॉ. बाबू यांच्या सुचनेनुसार नोटीस बजावण्यात आली आहे. उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर रोजी व तिसरी तपासणी १८ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. मरकड यांनी दिली आहे. 

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरूण शेलार, विजय कावळे, सहायक खर्च निरीक्षक विकास मीना, मुकेश ठाकूर, समन्वय अधिकारी (खर्च व्यवस्थापन कक्ष) तेजस्विनी बोकेफोड, एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी, व्हीव्हीटी पथकाचे नोडल अधिकारी राहुल माने आदी उपस्थित होते.

Tuesday, November 5, 2024

रमेश थोरात यांच्या प्रचार संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद


रमेश थोरात यांच्या प्रचार संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद 

दौंड प्रतिनिधी, ता. ५ : दौंड विधानसभा निवडणुकीचा जोर सध्या वाढु लागला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांनी प्रचार संवाद दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये नानगाव, कानगाव, हातवळण, कडेठाण, दापोडी या गावांमध्ये प्रचार संवाद दौऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली.

दापोडी येथे बाईक रॅली काढण्यात आली तर कानगाव येथे बैलगाडीमधुन मिरवणूक काढण्यात आली. दापोडी येथे भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यामध्ये छबु रुपनवर माजी ग्रामपंचायत सदस्य, शरद थोरात,नारायण नरुटे,संजय ठोंबरे व आदी मान्यवरांनी प्रवेश केला. यावेळी नागरिकांनी आलेल्या अडचणीचा पाढा रमेश थोरात यांच्या समोर वाचला. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन रमेश थोरात यांनी यावेळी दिले.