Sunday, November 16, 2025

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची निवड ; स्वागताध्यक्षपदी गौरव कोलते!

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या 
अध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची निवड ; स्वागताध्यक्षपदी गौरव कोलते!

जेष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची माहिती...

सासवड, दि. १७ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित १८ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी (ता. पुरंदर) येथे दि.२७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रशांत देशमुख यांची तर स्वागताध्यक्ष पदी गौरव कोलते यांची निवड करण्यात आली आहे.
अशी माहिती संमेलनांचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

महात्मा फुले यांचे मूळ गाव असलेल्या कऱ्हा नदीच्या काठावरील खानवडी येथे दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनात उद्घाटन समारंभ, कथाकथन, ग्रंथदिंडी, नाट्यप्रयोग, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाला प्रमुख पाहूणे म्हणून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर आदी उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाध्यक्ष प्रशांत देशमुख हे शिव व्याख्याते असून त्यांनी शेकडो व्याख्यानातून समाजाचे प्रबोधन केले आहे. गुड मॉर्निंग, जय शिवराय या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. श्री गौरव कोलते हे गेली पंधरा वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असून आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे संचालक आहे . प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात ते काम करीत आहेत. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता.

संमेलनाच्या संयोजन बैठकीला मराठा महासंघ पश्चीम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप, साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष श्यामकुमार मेमाणे, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धीवार, खानवडीचे माजी सरपंच रवींद्र फुले, रमेश बोरावके, दत्तात्रय होले, दत्तात्रय कड, भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, सचिव दीपक पवार, प्रसिध्दी प्रमुख अमोल भोसले, सुनील लोणकर, गंगाराम जाधव, प्रफुल्ल देशमुख, छायाताई नानगुडे, जगदीप वनशिव आदी उपस्थित होते.

या संमेलनात राज्यभऱातून दरवर्षी मोठ्या संख्येने लेखक, कवी, कलावंत सहभागी होतात. सहभागी होऊ इच्छिणा-या लेखक,कवींनी मो.९८८१०९८४८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री यादव यांनी केले आहे.

Tuesday, November 11, 2025

मानवतावादाची जपणूक करणारे साहित्य निर्माण होण्याची गरज-दशरथ यादव

मानवतावादाची जपणूक करणारे साहित्य निर्माण होण्याची गरज-दशरथ यादव

अहील्यानगर दि. ११ :  "सध्याचा काळात समाज संभ्रमावस्थेतून जात असून अशावेळी साहित्यिकांनी वास्तवाचे भान ठेवून निर्भीडपणे लेखन करावे, मानवतावादी मूल्याची जपणूक करणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी केले.

मराठी साहित्य मंडळ मुंबई आयोजित सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अहिल्यानगर (केडगाव) येथे आयोजन कऱण्यात आले होते त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून श्री यादव बोलत होते. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
श्री यादव म्हणाले, " मराठी भाषा जगवली ती डोंगर खोऱ्यात राहणाऱ्या शेती करणाऱ्या ग्रामीण माणसांनी. शेताच्या बांधावर काम करणाऱ्या समाजाचे दुःख साहित्यात मांडायला हवे, लेखकांनी सभोवतालचे वास्तव साहित्यात मांडणे गरजेचे आहे, सत्याचा शोध घेतलेले साहित्य हे टिकावू असते, मराठी साहित्याला फार मोठी परंपरा आणि विचार आहे, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचे संत साहित्य समजला दिशा आणि प्रेरणा देणारे आहे ."

आमदार संग्राम जगताप यांनी ग्रामीण भागात साहित्य संमेलने व्हायला हवीत. साहित्यातून समाज उभा राहतो. डिजिटल मिडिया च्या काळात वाचन संस्कृती कमी होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी मराठी साहित्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. कवी ना घ पांचाळ यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी विनायक जाधव, अनिता काळे यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनांचे संयोजन नानासाहेब डोंगरे, बाळासाहेब देशमुख, अनिता काळे, सुदर्शन धस, आशा शिंदे, भीमराव घोडके, बबनराव खामकर आदींनी केले आहे.सुत्रसंचालन विलास रासकर यांनी केले.