Sunday, August 4, 2019

भीमेचा रौद्र अवतार !




पारगाव प्रतिनिधी : ता.०४ ऑगस्ट २०१९ 

पुण्यात पावसाची संततधार सध्या चालू आहे.त्यामुळे दोन दिवसापासून धरण क्षेत्रात पाणी पातळी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

पुण्यावरून बंडगार्डन ७८ हजार व भीमा नदी अंदाजे ३३ हजार असे एकूण दौंड ८५  हजार कुसेक विसर्ग आहे.यानंतर या पाणी पातळीच्या अंदाजानुसार यामध्ये सतत वाढ होत आहे.उजनी धरण  आता पर्यंत ४३% झाले आहे.घोड धरण ७७% झाले आहे.घोड धरणात सकाळी  ९:०० वा. ८०% पाणीसाठा झाला असून  धरणात पाण्याचा वेग वाढत आहे.त्यामुळे  पूर नियंत्रणासाठी आज ता.०४ ऑग सकाळी ११:०० वाजता  घोड धरणातुन घोड नदीत २१६० पाणी क्यूसेकने सोडण्यात आले आहे.तरी घोड नदीकाठच्या व भीमा नदीच्या काठच्या ग्रामस्थांनी दक्षता घ्यावी.याबाबत महसूल व पोलीस खाते यांनी आपापल्या यंत्रणेमार्फत  नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याबाबत सुचीत केले आहे.


सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत दौंड तालुक्यातील राहू गावाजवळील पूल,वाळकी संगम पूल,दहिटणे येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा धरण क्षेत्रात पाऊस सुरु असल्यामुळे या पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी असे पत्र यावेळी पोलीस खाते,महसूल खाते,ग्रामपंचायत विभाग व ई यांना पाठवण्यात आले आहे.
चार ते पाच वर्षापूर्वी नानगाव व वडगाव रासाई या दोन गावांना जोडणारा पूल उभारला होता.या पुलावरून प्रथमताच पुराचे पाणी वाहू लागले आहे.पुलाला काही ठिकाणी चिरा पडण्यास सुरुवात झाली आहे.पाण्याचा वेग व धरण क्षेत्रात सतत चालू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी हि वेगाने वाढत असल्याचे पहावयास मिळत होते.

नदीकाठच्या शेतकरी वर्गाच्या शेत जमिनी पाण्याखाली गेल्या असून,त्यातील पिके नेस्तनाबूत झाली आहेत.नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होऊन आम्हाला नुकसान भरपाई मिळावी यावेळी शेतकरी वर्गानी अशी मागणी केली आहे.
पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी काळजी घेण्यात यावी असे आव्हान यावेळी महसूल खाते,पोलीस खाते,सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत करण्यात आले आहे.